प्रचंड मेहनत करणारा शेतकरी आज तंत्रज्ञानातील नवीन बदल स्वीकारत आहेत. सातत्याने बदलणारे हवामान, मजुरांची कमतरता, यांत्रिकीकरण तसेच आधुनिक शेतीच्या माहितीचा अभाव अशा अनेक समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. मागील काही दिवसापासून आपण बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेबद्दल ऐकत, बोलत आलेलो आहोत. AI in sugarcane farming याविषयी अनेक चर्चासत्रेही झाली आहेत. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेबद्दल आता फारशी शंका राहिलेली नाही.

परंतु लोकांचा एक असा समज झाला आहे की, हे तंत्रज्ञान फक्त ऊस शेतीसाठीच आहे. मात्र ते पूर्ण सत्य नाही. कारण कोठून तरी सुरुवात ही करावीच लागते. ऊस हे तर महाराष्ट्राच्या अर्थकारणातील सर्वात महत्त्वाचे नगदी पीक आहे. त्यामुळे साहजिकच पहिल्या टप्प्यात ऊस पिकामध्ये हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी भर देण्यात आला. आता मात्र हे तंत्रज्ञान सर्व पिकासाठी कशा पद्धतीने वापरता येईल याविषयीचे विचारमंथन आणि प्रत्यक्ष शेतीमधील प्रयोग बारामती मध्ये सुरूदेखील झाले आहेत. येणाऱ्या एक, दोन वर्षात त्याविषयीचे निष्कर्ष आपल्यासमोर येतीलच.
या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ऊस पिकाचीच निवड का केली?
ऊस हे खात्रीचे नगदी पीक असल्यामुळे शेतकरी त्याला प्राधान्य देतात. दोन वर्षात उसाचे एक पीक आणि गहू किंवा हरभऱ्याचे एक पीक शेतकरी घेत असतो. आता मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या तंत्रज्ञाने 2 वर्षात 2 नव्हे तर 3 पिके घेता येतील. तसेच आर्थिक लाभाबरोबरच इतर काही लाभ मिळवता येतील का याचेही नियोजन सुरू झाले आहे. पण यासाठी शेतकरी आणि कारखानदार यांच्या सहकार्याची तसेच प्रयोगशील वृत्तीची आवश्यकता आहे.
2 वर्ष (24 महिन्यांचा) पिक आराखडा AI in sugarcane farming:
या क्षेत्रातील तज्ञांच्या मतानुसार, आपण 15 जून 2025 च्या सुमारास सोयाबीन लागवड करावी. योग्य व्यवस्थापनात हे पीक 15 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत काढणीस येईल. त्यानंतर मशागत करून 25 ऑक्टोबर 2025 पर्यंत उसाच्या लागवडीचे नियोजन करावे. ऊस लागवड करताना महत्त्वाची बाब म्हणजे खत आणि पाणी याच्या व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन चा वापर करणे उपयुक्त ठरेल. तसेच आम्ही शिफारशीत केलेल्या जातीच्या ऊस रोपांची लागवड करणे महत्त्वाचे आहे. यामुळे वेळ, पाणी, खत आणि पीक व्यवस्थापन यावर होणारा खर्च वाचेल. कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानामुळे हा ऊस तोडणीसाठी बारा महिन्यांमध्ये म्हणजे साधारणतः 15 ऑक्टोबर 2026 मध्ये तयार असेल. त्यानंतर एक नोव्हेंबर 2026 किंवा फार तर पंधरा डिसेंबर 2026 पर्यंत जमीन गहू किंवा हरभरा यासारख्या रब्बी पिकांच्या लागवडीसाठी उपलब्ध होऊ शकते.
म्हणजेच आता तिसरे पीक मार्च 2027 च्या मध्यापर्यंत कापणीसाठी तयार असेल. त्यानंतर 1 एप्रिल ते मे 2027 च्या दरम्यान ताग किंवा धैंचा घेता येईल. याचा जमिनीचा पोत सुधारण्यासाठी फायदा होईल. अशा पद्धतीने आपल्याला 24 महिन्यात या तंत्रज्ञानाच्या आधारे 2 ऐवजी 3 पिकांची लागवड करणे शक्य होणार आहे. या तीन पिकामुळे शेतकऱ्यांना आणखी आर्थिक फायदा होईल.
या तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी कोणत्याही पिकातून एकरी किमान एक लाख रुपयांचा नफा व्हायलाच हवा असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. या प्रयोगाच्या प्रात्यक्षिकासाठी, प्रत्येक गावातील किमान 10 एकर जमीन संबंधित साखर कारखान्याने बारामतीच्या एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टला उपलब्ध करून द्यायला हवी. या जमिनीवरील पीक लागवड आणि नवीन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक पाहू शकतील. प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतात हे तंत्रज्ञान यशस्वी झाल्याचे दिसल्यानंतर संपूर्ण गावातील शेतकरी या पीक पद्धतीचे अनुकरण करतील, यात शंका नाही. या पीक लागवड तंत्रामध्ये उसाबरोबर आपण धान्य म्हणजेच गहू, सोयाबीन अशा पिकांचा समावेश केला आहे. समाजाची अन्नधान्याची भूक भागवण्यासाठी हे पीक नियोजन आणि व्यवस्थापन नक्कीच उपयुक्त ठरेल.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि काटेकोर शेती तंत्रज्ञानाचा वापर करून पीक उत्पादन वाढवणे आता शक्य आहे. त्यासाठी नवीन पीक पद्धती उपयोगात आणणे आवश्यक आहे. यामुळे पाणी, खत, मजूर आणि वेळेची बचत होणार आहे. या बरोबरीनेच जमिनीचा पोत सुधारून गुणवत्तापूर्ण पीक उत्पादन वाढीला चालना मिळेल हे सिद्ध झाले आहे. बारामती येथे विकसित केलेले AI in sugarcane farming हे तंत्रज्ञान परदेशातून म्हणजे व्हिएतनाम, फिलिपाईन्स आणि भारतातील तामिळनाडू राज्यातून वापरण्यासाठी पाठपुरावा होत आहे.
‘स्मार्ट शेती’ AI in sugarcane farming
हवामानातील बदल आणि संसाधनांच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश करण्याची गरज आहे. शेती क्षेत्रामध्ये नव्याने काही प्रयोग करू इच्छिणाऱ्या प्रगतशील तरुण शेतकऱ्यांना ही चांगली संधी आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून स्मार्ट शेती करण्यासाठी हा टर्निंग पॉईंट ठरणार आहे.
AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान कृषी क्षेत्रात कसे काम करते?
कृत्रिम बुद्धिमत्ता ही प्रणाली उपग्रह प्रतिमा, हवामान अंदाज, माती सेन्सर्स आणि शेती इनपुट सारख्या विविध स्रोतांकडून डेटा गोळा करतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना पीकच्या योग्य व्यवस्थापनासाठी वैयक्तिकृत शिफारसी मिळतात. जसे की सिंचन वेळापत्रक, खते आणि कीटक नियंत्रण यांचा समावेश आहे.
ऊस शेतीमध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या’वापरातून होणारे फायदे
- उत्पादनात 40 टक्क्यांपर्यंत वाढ.
- उत्पादन खर्चात 20 ते 40 टक्क्यांची घट.
- पाण्याची बचत 30%.
- रासायनिक खतांच्या वापरात 25% घट.
- कापणी कार्यक्षमतेत 35 टक्क्यांपर्यंत सुधारणा.
- सातत्याने पीक निरीक्षणामुळे कीडकनाशकांच्या वापरात 25 % बचत.
- सेंद्रिय कर्ब, जमीन सुपीकतेमध्ये वाढ.